• हर हर गंगे…

    "लोग तो कचरा डालेंगे लेकीन हम अपना काम करेंगे" टेमसुटला अॅमसग, वाराणसीच्या बबुवा पांडे घाटावर मला सांगत होती. कोण कुठली नागालॅन्डची टेमसुटला गेले वर्षभरापासून गंगा किना-याच्या घाट स्वच्छतेसाठी तिने वाहून घेतलय. सोमवारी तिच्याशी गप्पा मारण्याचा योग आला. गंगेचा प्रवाहीपणा अनुभवण्याचा योग आला. मुंबईत गरमागरम चर्चा सुरू असताना मी मात्र तिथे गंगेच्या काठी बसून शांतता अनुभवत होतो. तिचा गंभीर प्रवाह पाहत होतो. काय काय पोटात घेऊन शांतपणे ती वाहत होती, कसलाच पत्ता न लागू देता... रोजची संध्याकाळची चॅनेलवरची खडाजंगी विसरून त्या दिवशी गंगाआरतीतील प्रसन्नता अनुभवत होतो.


    सकाळी सकाळी भगवान शंकराच दर्शन घेतलं, सुदैवाने उत्तरेतील श्रावण अगोदरच संपला असल्याने तशी फार गर्दी नव्हती मग घाट पाहण्याच्या निमित्ताने सुरू झालं वाराणसी दर्शन. सप्टेंबर असून सूर्य महाराज आग ओकत होते, तापमान कधीच ३६ क्राॅस करून गेल होत मुंबईकराच्या दृष्टिने हे टळटळीत उनंच. उंचच उंच हवेल्या, त्याचे बुटके दरवाजे, त्या दरवाजांचा असणारा विशिष्ठ बाज, छोटे आणि अरूंद गल्लीबोळ, त्यातील खडबडाटी दगडाचे रस्ते. आम्हाला हे अरूंद वाटत होते मात्र जेमतेम तीन फूटाच्या गल्लांतून स्थानिक लोक निवांत फिरत होते. मधूनच एखादं दुकानपण दिसायचं. जागोजागी असलेली मंदीर आणि शिवलिंग आणि फिरणारे शेकडो साधू. मुळातच चिंचोळे रस्ते त्यांवर मोकाट फिरणा-या गाई... या गाई आणि साधूंना खायला देत पुण्य वसुल करणारे भाविक. रस्त्यावरच बसलेले साधू. कुणी आपल्याच तंद्रीत मग्न तर कुणी मोठमोठ्यान काही तरी वाचतोयं. आपापले कंपू सांभाळत फिरणारे प्रवाशांचे थवे. थेट राज्य नसल तरी पटकन हे दक्षिणेतले यात्रेकरू, हे पूर्वेकडचे दिसतायत, हे सहजपणे सांगता येऊ शकत. एक वेगळच विश्व होत सगळं.

    लोकांची पान खायची आवड किती ते तर रस्त्यारस्त्यावर दिसत होत. 'खावं आणि तिथेच टाकावं' हा आपला मंत्र कटाक्षाने लोक पाळत होते. सहजपणे आमच्या सोबत असलेल्या स्थानिकाला विचारल हे संगळ असं...? माझ्या प्रश्नाचा रोख लक्षात घेऊन तो म्हणाला," साहबजी, पिछले एक साल से हम लगे है मोदीजींके आनेके बाद, यहा स्वच्छता के प्रयास हो रहे है लगबग पचास पर्सेंट साफ हो गया है." मी चक्रावलोच, म्हटल-  ५० टक्के हे तर अगोदर किती असेल? पण त्यामानाने बनारस हिंदु विद्यापीठाचा परिसर खूपच स्वच्छ वाटला. इथलं मंदीरसुद्धा स्वच्छ आणि मोठ प्रसन्न होतं. प्रशस्त गाभारा आणि त्यातील भव्य शिवलिंगावर सतत सुरू असलेला अभिषेक.

    एका दिवसात जेजे पहायला मिळेल ते पाहत होतो, घाट पाहिले, लोकांच आगत स्वागत अनुभवल, 'पुडीभाजी' खाल्ली, 'भोग का प्रसाद' पण घेतला. 'गंगामैय्या'ला काठाकाठाने अन् बोटीतून अनुभवत होतो. पण सगळ्यात एक वेगळी भेट अनुभवली ती म्हणजे टेमसुटलाची, वाराणसीमध्ये सध्या अनेक पातळींवर स्वच्छ वाराणसीचे प्रयन्त सुरू आहेत. टेमसुटला ही त्यापैकीच एक. मुळची नागालॅन्डची आणि जन्माने ख्रिश्चन पण गंगेच्या बबुवा पांडे घाटाच्या स्वच्छतेसाठी झटतेय आणि ते सुध्दा कोणत्याही अपेक्षेविना. कधीकाळी इतरांप्रमाणे बोटींगसाठी आलेली ही टेमसुटला अस्वच्च्छ परिसर पाहून इतकी अस्वस्थ झाली कि हे बदलायचेच असा तिनं निर्धार केला आणि उभी राहिली घाटाच्या स्वच्छतेसाठी. बबुवा पांडे घाट किंवा धोबी घाट कधी काळी हा वाराणसीतल्या सर्वांत अस्वच्छ घाटापैकी एक होता.

     मात्र, आता स्वरूप एकदम बदललं. घाट चकचकीत झालाय. सुरुवातीला लोकांनी सांगितलं हे अशक्य आहे. रोज नवी लोक यायची घाटावर. स्थानिक आणि पाहुणे यांच्या कच-यात घाटाची वाट लागायची. कुणा मदतीविना हे काम तिनं सुरू केलं. सोशल मिडियावर आवाहन केल हा घाट स्वच्छतेसाठी ज्यांना यायच त्यांनी याव.  हळूहळू प्रतिसाद मिळाला आज १०/१२ महाविद्यालयीन विद्याथ्यांची टीम तयार झालीय. रोज जमायच घाट स्वच्छ करायचा. काही वेळेस तर रात्र रात्र घाटावर मुक्काम करायचा. लोकांना कचरा टाकण्यापासून परावृत्त  करायचं. एकेकाळी तर पाय-यांवर इतकी माती साठली होती की पाय-या गायब झाल्या होत्या. नदीला पाणी कमी होत पण माती अन् कच-यामुळे पाय-या दिसत नव्हत्या. हा सगळा कचरा काढला. आणि आता स्वच्छ बबुवा पांडे घाट दिसायला लागतो.


    अर्थातs एकदा साफ होण्यान तिच काम संपणार नव्हत. रोज नवा कचरा घाटावर येतो आणि तिची टिम कामाला लागते. आता स्वच्छ घाट पाहून लोकं बसतात आणि आमचा नावेचा धंदा वाढला त्यामुळे मीपण या कामात आता सहभागी झालो, वीशीतला मायकल जो नाव चालवतो तो सांगत होता. आता थोडेफार नावड्यांना पण कळतय त्यामुळे तेही सहभागी होतायत.
    कसलीही मदत नाही किंबहुना त्रासच जास्त कसलाही फायदा नाही, असं असताना या घाटांना सौंदर्य देण्यामागची प्रेरणा काय? निराशा कधी येते का? या प्रश्नावर ती हसली म्हणाली मुळात कोणत्याही अपेक्षेने काम सुरू केलं नाही, त्यामुळे फायदा नव्हता धरला, राहता राहिला प्रश्न निराशेचा हो येते. पण पुन्हा बजावते स्वत:ला' लोग असेच वागणार'. इथे घाटाच्या वरती एक गोठा आहे तिथून वर्षानुवर्षे गाई-म्हशींचे शेण थेट फेकले जाते ते घाटावर. आता ही स्वच्छता मोहीम सुरू झाली तरी हे शेण फेकणं थांबल नाही. मुलं साफ करतायत हे पाहून सुध्दा थांबल नाही. समजावून सांगून, विनंती करून झालं शेवटी आम्हीच ठरवलं हेच आपल आव्हान आहे कामाच. आजही ते शेण फेकतात, आम्ही साफ करतो. पण आता बदल खुप झालाय. लोक स्वच्छता स्वीकारताय.. टेमसुटला भरभरून बोलत होती. आम्ही कामाला उभे राहिलो कि सगळेजण मदतीला येतात. एकदा घाटावर हजार दिवे लावायचे आम्ही ठरविलेल पण आमची टीम तर लहान होणारं कंस इतके दिवे लावून होणार? म्हणून माईक वरून आवाहन केले. येतील की नाही माहिती नव्हते  पण पटापट लोकं जमली अन् हा घाट अक्षरश: दिव्यांनी उजळून  निघाला...

    तिच्या कामांची दखल खुद्द पंतप्रधान मोदींनी घेत तिला शाबासकी दिली. घाट स्वच्छ करण हा केवळ उद्देश्य नाही. आपआपल्या स्तरावर लोकांनी ठरवलं तरी गंगा स्वच्छ होऊ शकते असं तिच म्हणणं. इतक काम करीत असूनही फार काही मोठ काम करत आहोत असा बिलकुल तिचा ग्रह नाही.

    जेमतेम एक दिवसाला मुक्काम पण एका दिवसात बरेच अनुभव दिला. प्रतिकूल परिस्थितीत काम करणारी टेमसुटला, येईल त्यांच गा-हाण एेकणारा आणि त्यांन अर्पण केलेल जल स्वीकारणारा काशी विश्वेश्वर आणि काठावरच्यानी कितीही काही टाको स्थितप्रज्ञपणे वाहणारी गंगामैय्या'...

    @keshavupadhye

  • You might also like

    2 comments:

    1. नमस्कार,,,खूप दिवसानी वाचायला मिळाले...चॅनेलच्या गप्पांमध्ये तुमचे लिखाणही आम्हाला वाचायला मिळू देत
      अभिनंदन

      ReplyDelete
    2. नमस्कार सर...चँनलवरचे तुमचे परखड मत ऐकायला मजा येते...

      ReplyDelete