• गदारोळातही भाजपाने वेगळेपण जपलं



           

    भारतीय जनता पार्टीसाठी यंदाच्या महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अनेक अर्थाने वेगळ्या आहेत. समाजातील सर्व स्तरांतून लोकांचा पक्षाकडे ओघ वाढला आहे. अन्य राजकीय पक्षच नव्हे तर सामाजिक संघटना आणि अगदी राजकारणापासूत दूर राहिलेली मंडळीसुद्धा भाजपात येत आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जी विकासाची दिशा पकडली आहे त्यात स्वत:चा स्वारीचा बाटा उचलण्याच्या उद्देशाने पक्षात लोक दाखल होत आहेत. त्यामुळे साहजिकच काल जिथे 'आप' च्या कडे उमेदवारही नव्हता अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणावर इच्छुक तयार झाले आहेत.

     

    इच्छुकांची संख्या वाढली तरी जागा मात्र तितक्‍याच असतात. उमेदवारी एकालाच द्यावी लागते. मुंबईतच 227 जागांसाठी अडीच हजारांहून अधिक जणांनी निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, उमेदवार निवडीची भाजपाची प्रक्रिया निश्‍चित आहे. कोणी एक व्यक्ती, नेता उमेदवार ठरवत नाही. सामूहिक प्रक्रियेतून निवड केली जाते. मंडल स्तरापासून संसदीय मंडळापर्यंत याबाबत चर्चा होते. या निवड मंडळामध्ये महिला, दलित, मागासवर्गीय अशा सर्वच घटकांचे प्रतिनिधी असतात. शिवाय, या वेळी आम्ही सर्वेक्षणाचा देखील आधार घेतला. विजयाची खात्री असल्यामुळे इच्छुकांची संख्या जास्त होती तरीही तुलनेने भाजपात कमी बंडखोरी झाली.

     

     पारदर्शक निवड प्रक्रियेनंतरही काही ठिकाणी नाराजी निर्माण झाली. लोकांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून अर्ज दाखल केले.  मात्र भाजपात नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये पारिवारिक संबंध आहेत. चर्चेद्दारे समजूत काढल्यानंतर जवळपास 90 टक्‍के बंडखोरांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. काही ठिकाणी बाहेरचे लोक आले आणि त्यांना संधी दिली म्हणून नाराजी निर्माण झाली. कठीण काळात आम्ही पक्ष वाढविला आणि आता बाहेरच्यांना संधी का, हा जुन्या कार्यकर्त्यांचा प्रश्‍न रास्त आहे. पण पक्ष संघटना प्रवाही असते. नवे लोक, घटक पक्षात येतात. पक्षाची वैचारिक चौकट आणि परंपरा आत्मसात करतात आणि आज बाहेरचे वाटणारेच उद्या पक्षाचे आधारस्तंभ होतात.

     

     तरीही नवीन कार्यकर्ते आणि जुनी संघटना, कार्यकर्ते यांच्या समन्वयातून प्रवास चालू राहतो. ही काही अचानक घडणारी प्रक्रिया नाही. सातत्याने ती घडत असते. मुळात भाजपाचा कार्यकर्ता वैचारिक बैठक असणारा कार्यकर्ता आहे, कार्यकर्ता संवेदनशील असतो. त्यामुळे काही ठिकाणी नाराजी, बंडखोरी झाली तरी ती तत्कालिक बाब असते. एखाद दोन दिवसांत तो पुन्हा आपल्या  विचारांसाठी, कार्यासाठी तयार होतो आणि पक्षाच्या विजयासाठी कामाला लागतो. त्यामुळे यंदाच्या राजकीय गदारोळातही भाजपाने आपले वेगळेपण आणि वैचारिक प्रतिष्ठा जपली आहे.

     

    (लेखाची पूर्वप्रसिद्धी  लोकमत,  12 फेब्रुवारी 2017)  

     

    केशव उपाध्ये, मुख्य प्रवक्ता  


     

  • You might also like

    No comments:

    Post a Comment