• पहिली बाजू: युतीत ‘मिठाचा खडा’ टाकू नका..




    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या वर्षपूर्तीस काही दिवसच बाकी आहेत.

    विरोधी पक्षीयांना खोटय़ा गुन्ह्यांत अडकवणारे सरकार जाऊन महाराष्ट्राला पुन्हा वैभवशाली बनवण्यासाठी भाजपने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेशी युती केल्यानंतर फडणवीस यांनी स्वतची लोकप्रियता जाहीर केलेली नाही. अहंकाराच्या खेळास येथे थारा नाही..

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या वर्षपूर्तीस काही दिवसच बाकी आहेत. या एका वर्षांच्या कालखंडात या सरकारने महाविकास आघाडीच्या अडीच वर्षांच्या काळात निर्माण झालेला विकासाचा अनुशेष भरून काढत राज्याला पुन्हा देशातील पहिल्या क्रमांकाचे राज्य बनविण्याच्या दिशेने निर्धारपूर्वक पावले टाकली आहेत. असे असताना राज्य सरकारच्या कामाचे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामगिरीचे कौतुक करणारी एक जाहिरात प्रसिद्ध झाल्याने भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युतीच्या विरोधकांना साहजिकच आनंदाच्या उकळय़ा फुटल्या. विरोधकांनी युतीच्या एकसंधतेवर, परस्पर विश्वासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे सुरू केले. 

    पुढील पाच वर्षे आपल्याला राज्याच्या सत्तेतून कोणीच हटवू शकणार नाही, या गुर्मीत वावरणाऱ्या मंडळींना डोक्यावरचा सत्तेचा राजमुकुट गमवावा लागल्याने अतीव दु:ख झाले आहे. हे दु:ख शांतपणे पचविण्याची मानसिकता नसल्याने या सरकारच्या कामगिरीबद्दल अपप्रचार करण्याची एकही संधी विरोधक दवडत नाहीत. याच मानसिकतेतून राज्यातून उद्योग अन्य राज्यांत गेल्याचा अपप्रचार केला गेला. सामाजिक सलोखा धोक्यात आणण्याचे प्रयत्न तर सातत्याने होत आहेत. त्याला यश मिळत नाही हे दिसल्यावर वैफल्यग्रस्त झालेल्या मंडळींना या जाहिरातीच्या रूपाने हातात कोलीतच मिळाले. जाहिरातीनंतर खुलासे वगैरे झाले, वातावरण शांत झाले, धुरळा खाली बसला. पण झाले ते योग्य झाले नाही.

    या जाहिरातीवरून विविध माध्यमांतून मतप्रदर्शन करणाऱ्या सर्वानी एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात ठेवणे आवश्यक आहे, ती म्हणजे महाराष्ट्राला पुन्हा वैभवसंपन्न बनविण्याच्या व्यापक हेतूने भारतीय जनता पक्षाने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेशी युती केली आहे.

    मुख्यमंत्रीपद देण्याचा मोठेपणा

    भारतीय जनता पक्षाचे १०६ आणि सहयोगी सात असे ११३ आमदारांचे संख्याबळ असताना मुख्यमंत्रीपद मित्रपक्षाला देण्याचा मोठेपणा भाजपा नेतृत्वाने घेतला आहे. उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात महाराष्ट्राची सर्वच आघाडय़ांवर मोठी पीछेहाट झाली. विरोधकांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना खटल्यांच्या आणि चौकशांच्या चक्रात अडकविण्याची सूडचक्राची संस्कृती जन्माला घालण्याचे पातक उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा अधिकार वापरून केले.

    नारायण राणे यांच्यासारख्या केंद्रीय मंत्र्याला अटक करण्यासाठी राज्याची सारी पोलीस यंत्रणा वेठीस धरली गेली, खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्याविरोधात राजद्रोहाचा गुन्हा नोंदवून तुरुंगात डांबले गेले. मोगलाई, ब्रिटिश सत्तेलाही लाजवणारे असे प्रकार होत असताना शरद पवारांसारख्या नेत्याने उद्धव ठाकरे यांना समजुतीच्या चार गोष्टी सांगण्याऐवजी मूग गिळून गप्प बसणे पसंत केले. सॅफ्रन, टाटा एअरबससारखे प्रकल्प मुख्यमंत्रीपद भूषवणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या निष्क्रियतेमुळेच महाराष्ट्रातून गेले. सचिन वाझेच्या खंडणी प्रकरणाने तर महाराष्ट्राची लाज गेली. महाविकास आघाडीच्या कार्यकाळात राज्यात नवे उद्योग येण्यास तयार नव्हते. शर्जील उस्मानीसारख्या हिंदूंवर गरळ ओकणाऱ्या जात्यंधांना अटक करण्याचे धाडस उद्धव ठाकरे यांना दाखविता आले नव्हते. त्रिपुरातील एका कथित घटनेचे निमित्त करत नांदेड, अमरावती येथे हिंदूूंवर हल्ले चढवले गेले. उमेश कोल्हेची जिहादी मानसिकतेतून हत्या झाली. ही परिस्थिती बदलण्यासाठी भारतीय जनता पक्षाने हिंदूुत्वाच्या व्यापक हितासाठी ही युती केली आहे.

    सत्ता हे विचारधारा राबविण्याचे साधन

    भारतीय जनता पक्षाने २०१४ पर्यंत अपवाद वगळता वर्षांनुवर्षे विरोधी पक्षातच राहून काम केले आहे. त्यामुळे ‘आमच्यामुळे भाजपा सत्तेत आहे’ अशा फुशारक्या कोणी मारू नयेत. आम्हाला सत्तेचे अप्रूप कधीच नव्हते, यापुढेही नसेल. १९५१ पासून जनसंघ आणि १९८० नंतर भाजपच्या रूपाने आम्ही राष्ट्रीय राजकारणात उभे आहोत. या काळात देशाने अनेक राष्ट्रीय पक्ष, प्रादेशिक पक्ष उगवताना आणि मावळतानाही पाहिले. पण आमची विचारधारा देशाच्या राजकारणात ७० वर्षांपेक्षा अधिक काळ अभिमानाने उभी आहे. जनसंघाच्या स्थापनेवेळी ३७० वे कलम रद्द करा, समान नागरी कायदा लागू करा या मागण्या आम्ही केल्या होत्या. त्यापैकी ३७० वे कलम रद्द करून आम्ही आमची बांधिलकी दाखवली आहे. दुसरी मागणीही पूर्ण होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. आपली विचारधारा प्रत्यक्षात आणण्याचे सत्ता हे साधन आहे, या विश्वासाच्या बळावर आमचा आजवरचा प्रवास झाला आहे. या जाहिरातीच्या निमित्ताने भाजप नेतृत्वाला उद्देशून जे काही बोलले गेले, ऐकवले गेले ते पाहिल्यावर अटलबिहारी वाजपेयी यांच्या ‘छोटे मन से कोई बडा नही होता, टूटे मन से कोई खडम नहीं होता’ या काव्यपंक्तींचे साहजिकच स्मरण होते. देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाने सांगितले म्हणून त्यावेळच्या शिंदे गटाशी युती करताना आपले संख्याबळ अधिक असले तरी मुख्यमंत्रीपदाचा आग्रह धरला नाही. 

    फडणवीसच सर्वाधिक लोकप्रिय!

    मुख्यमंत्रीपद पाच वर्षे सांभाळल्यानंतर राज्याच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री किंवा कोणत्याही खात्याचे मंत्रीपद स्वीकारणे योग्य वाटत नसल्याने मंत्रिमंडळात सहभागी व्हायचे नाही, असा निर्णय फडणवीस यांनी घेतला होता. मात्र राज्याच्या हितासाठी त्यांनी मंत्रिमंडळात असणे आवश्यक आहे, असे नेतृत्वाला वाटल्यानंतर पक्षाचा निर्णय शिरोधार्य मानत इच्छा नसतानाही त्यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारले. ‘जया अंगी मोठेपण, तया यातना कठीण’ हे फडणवीस यांच्याकडे पाहिले की कळते. या रामायणानंतरही त्यांनी चकार शब्दही उच्चारला नाही. युतीचे हित डोळय़ापुढे ठेवून फडणवीस यांनी मनाचा मोठेपणा दाखवला आहे.

    आज महाराष्ट्रात सर्वाधिक लोकप्रिय एकमेव नाव आहे ते म्हणजे देवेंद्र फडणवीस. मात्र आपण किती लोकप्रिय आहोत हे जाहीर करण्याची त्यांना कधी आवश्यकता वाटली नाही. फडणवीस यांचा आदर्श डोळय़ापुढे ठेवत, आपल्याला यापुढे मोठे युद्ध जिंकायचे आहे, हे डोक्यात भिनवून युती समर्थकांनी अशा छोटय़ा छोटय़ा गोष्टींतून एकमेकांशी लढत बसण्याचा करंटेपणा करू नये. २०२४ चे युद्ध जिंकण्यासाठी अहंकाराच्या खेळात अडकून युतीत मिठाचा खडा पडावा म्हणून प्रयत्न करणाऱ्यांना साथ देऊ नका, एवढेच यानिमित्ताने सांगावयाचे आहे.


    (लेखाची पूर्वप्रसिद्धी –लोकसत्ता ऑनलाइन, २०जून २०२३)

    केशव उपाध्ये, मुख्य प्रवक्ता

  • You might also like

    No comments:

    Post a Comment