• होय सावरकरही आमचे आणि गांधीही.. !


         होय, सावरकरही आमचे, गांधीही आमचे, आंबेडकरही आमचे आणि भगतसिंहसुध्दा आमचे... इतकेच नव्हे तर या देशाच्या स्वांतत्र्यासाठी ज्यांनी ज्यांनी लढा दिला तो प्रत्येक ज्ञात अज्ञात स्वातंत्रवीर आमचा आहे. वैचारीक मतभेद आहेत म्हणून अथवा क्षुद्र पक्षीय राजकारणासाठी या नेत्यांना आमच्या तुमच्यात विभागण्याचे वैचारीक दारिद्र्य आणि अपरिवक्वता आमच्याकडे नाही. 

         लोकसभेत काँग्रेस उपाध्यक्ष राहूल गांधी यांनी महात्मा गांधी आमचे आणि सावरकर तुमचे अशी मांडणी केल्याबरोबर लगेचच काँग्रेसच्या ट्वीटर अकाऊंटवरून स्वातंत्र्यवीर सावरकर यांना नकली देशभक्त असा दावा करणारा ट्वीट केला गेला. खरंतर सावरकरांना बदनाम करण्याचा हा पहिला प्रयत्न नाही. काँग्रेसप्रणित युपीए च सरकार असताना सावरकरांच्या काव्यपंक्ती असलेली अंदमानातील पाटी काढून टाकण्याचा अंगचोरपणा मणीशंकर अय्यर यांनी केला होता.

         हिंदुत्व म्हणजे काहीतरी महाभयंकर, वाईट आणि प्रतिगामी त्यामुळे ते मांडणारे तर अतिवाईट अशी एक मांडणी गेले काही वर्ष सातत्याने समाजातील ढोंगी धर्मनिरपेक्षतावाद्यांकडून सुरू आहे. इतिहासाची मोडतोड करून सावरकरांचे कतृत्त्व पुसण्याचे, त्यांच्या स्मृती नष्ट करण्याचे, कलंकित करण्याचे अविरत कष्ट ही मंडळी घेत आहेत. क्रांतीकारी, समाजसुधारक, बुध्दीवादी, विचारवंत, साहित्यिक अशी अनेक अंगाने ज्यांची ओळख त्यांना नकली म्हणणं हा केवळ त्यांचा उपमर्दच नाही तर देशाच्या स्वांतत्र्य लढ्याचा घोर अपमान आहे.

         या देशाच्या स्वांतत्र्य लढ्यात अनेकांनी अनेक प्रकारचे योगदान दिले. त्यांच्या वैचारिक भूमिकेबद्दल कदाचित पराकोटीचे मतभेद असू शकतात, पण म्हणून त्यांचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान हे कमी करता येत नाही. ते करताही कामा नये आणि म्हणून राहूल गांधी विचारतात की सावरकर आपके है ना? तेव्हा त्यांना म्हणावेसे वाटते की होय सावरकरही आमचे, गांधीही आमचे, आंबेडकरही आमचे आणि भगत सिंह सुध्दा आमचे... इतकेच नव्हे तर या देशाच्या स्वांतत्र्यासाठी ज्यांनी-ज्यांनी लढा दिला तो प्रत्येक ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यवीर आमचा आहे. वैचारीक मतभेद आहेत म्हणून अथवा क्षुद्र पक्षीय राजकारणासाठी या नेत्यांना आमच्या तुमच्यात विभागण्याच वैचारिक दारिद्र्य आणि अपरिवक्वता आमच्याकडे नाही. या स्वतंत्र देशाचे नागरिक म्हणून जगण्याचा अधिकार आणि वारसा ज्यांनी आम्हाला दिला त्या सर्वांना आम्ही आमचे मानतो. या देशाच्या बरबादीच्या घोषणा त्या ठिकाणी झाल्या तिथे जाऊन राहूल गांधी समर्थन करतात मात्र ज्यांनी त्यांचे आयुष्य हे या देशासाठी वेचले त्यांना नकली ठरविण्याचा कृतघ्नपणातरी करू नका.


         सावरकरांबद्दल ढोबळमानाने काही मुद्दे सातत्याने उपस्थित करून अपप्रचार केला जातो. त्यापैकी एक गांधी हत्येतील त्यांचा सहभाग, दुसरा अंदमानात त्यांनी कोलू ओढला नाही आणि ब्रिटीश सरकारला दया अर्ज केले. हे आरोप खोडणारे खंडीभर पुरावे उपलब्ध असतानाही सातत्याने हे बोलले जाते. साधा प्रश्न म्हणजे गांधी हत्येच्या कटात सहभागी असल्याच्या आरोपातून सावरकरांची न्या. आत्माचरण यांच्या न्यायालयाने सुटका केल्यानंतरही जर सावरकर हे कटात सहभागी असल्याचे ठामपणे सरकारला वाटत होते तर त्यावेळी पंतप्रधान नेहरू सरकारने वरील न्यायालयात का धाव घेतली नाही? याचे कारण त्यांच्याविरोधात कोणताही पुरावा नाही याची जाणीव सरकारला होती.

          ज्या कपूर आयोगाचा दाखला देऊन दोषी मानले जाते त्या कपूर आयोगाचे कामच मुळात सावरकरांच्या मृत्युनंतर सुरू झाले. आपल्याकडचा कायदा असे सांगतो की, ज्या चौकशीमुळे एखाद्या व्यक्तीची अप्रतिष्ठा होत असेल, तर त्याला तिची बाजू मांडण्याचा अधिकार आहे. मात्र तरीही त्यांच्या मृत्युनंतर त्यांच्यावर असा शेरा मारणे हे सावरकरांवर अन्याय करणारे आहे. 'गांधींच्या जीवाला धोका असल्याचे सावरकरांना माहित नव्हते असा आयोग स्पष्टपणे म्हणते मात्र तरीही सावरकर व त्यांच्या अनुयायांनी हे कारस्थान रचले होते' असा शेरा कशाच्या आधारे मारते हे सुध्दा स्पष्ट होत नाही.

         त्यांच्या इतर आरोपाबाबतही तसेच आहे. ब्रिटीशांकडे दया मागितली असा दावा काहीजण करतात खरंतर पेटीशन(अर्ज, निवेदन) हा तो मुळ शब्द आहे. तिथे मर्सी (दया) हा शब्दच नाही. पण सावरकरांना दोषी दाखविण्यासाठी काहीजणांनी मर्सी शब्द पुढे जोडतात. याच निवेदनात सावरकरांना कोलूला जुंपण्यात आले होते असाही उल्लेख आहे पण त्याचा उल्लेख करण्यात येत नाही. मुळात सावरकरांना इतर बंदीवानाना ज्या सोयी मिळायच्या त्याही सोयी मिळत नसत. अंदमानातील सेल्युलर जेलमध्ये तीन वर्षावर कोणालाही बंद करून ठेवण्यात येत नव्हते, पण सावरकरांना हा नियम लावण्यात आला नाही तर त्यांना 14 वर्षे बंद करून ठेवण्यात आले. 16 ऑगस्ट 1911 या दिवशी त्यांना कोलूवर प्रथम जुंपण्यात आले. त्यांना नंतरही सुट मिळाली नाही. 8 जुन 1914 मध्ये काम करण्यास नकार दिला म्हणून त्यांना 8 दिवस हातक़ड्यात उभे करण्यात आले. अनेक प्रकाराने त्यांचा छळ करण्यात आला. इतर अनेक कैद्यांना देण्यात येणाऱ्या सवलती त्यांना नाकारण्यात आल्या.

         राजबंदीवानाच्या सुटकेसाठी कोणते प्रयत्न केले याचे वर्णनसुध्दा माझी जन्मठेप मध्ये आहे. अंदमानात राहून जे काही राष्ट्रहीत साधता येईल त्यापेक्षा भारतात जाऊन जास्त काही करता येईल ही सावरकरांची भूमिका होती.  छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफजल खानास आपण खुप घाबरलो आहे अशा आशयाचे लिहीलेले पत्र हे त्याला बेसावध करण्यासाठी होते. राजनीतीचा हा एक भाग आहे. 1931 मध्ये लाँर्ड आर्यवीन यांच्यासोबत सविनय कायदेभंग मागे घेण्याची तसेच दुसऱ्या गोलमेज परिषदेत सहभागी होण्याचा करार केल्याने महात्मा गांधीचा कारावास रद्द झाला होता. याचे वर्णन कसे करणार .. दुसऱ्या महायुध्दाच्यावेळी गव्हर्नर जनरल ना पाठविलेल्या पत्रात सावरकर म्हणतात माझा उद्देश हा राजबंद्याची मुक्तता हाच असल्याने मला स्वताला न सोडले तरी मी असंतुष्ट असणार नाही. इतक स्वच्छ आणि स्पष्ट सावरकरांनी लिहुन ठेवल असतानाही अशा गोष्टी त्यांच्याविरोधात मांडल्या जातात.

          काँग्रेस आता त्यांच्या नेत्यांनाच खोट पाडत आहे का असा प्रश्नही पडत आहे. महात्मा गांधी आणि सावरकरांचे मतभेद सर्वांनाच माहित आहेत. मात्र विरोध असतानाही गांधीजीनी 1937 मध्ये उद्गार काढले होते, कि त्याग हा आम्हा उभयताना एकत्र आणणारा दुवा आहे. दस्तुरखुद्द राहूल गांधीच्या आजी इंदिरा गांधी या म्हणतात, 'सावरकर म्हणजे साहस आणि देशभक्ती यांचे समीकरण.'

        काँग्रेस आणि ढोंगी धर्मनिरपेक्षतावादी यांच्याकडून एकाच घराण्याला सोयीचा इतिहास हा सात्यत्याने मांडण्याचा प्रयत्न गेले काही वर्ष झाला. राहूल गांधीचे वक्तव्य हा त्याच परंपरेतील आहे. भारताच्या वैविध्यतेची जपमाळ करीत आपल्यापेक्षा विरोधी अथवा वेगळा सूर येता कामा नये याची दक्षता काँग्रेसने कायम घेतली. सहिष्णूतेचा उच्चारव करताना आपलाच विचार हाच एकमेव आहे हे ठसविण्याचा प्रयत्न त्यांनी सातत्याने केला त्यातून सावरकरांसारख्या ज्वाज्वल्य देशभक्ताची पराकोटीची अवहेलना करण्यात आली.

         खरंतर इशरत जहा प्रकरणात काँग्रेसने राजकीय फायद्यासाठी प्रतिज्ञापत्रात बदलले. देशहिताशी तडजोड केली सगळे संदर्भ बदलण्याचा प्रयत्न केला. भाजपा सरकारवर इतिहासाची मोडतोड केल्याचा आरोप केला जातो पण खरी मोडतोड तर काँग्रेसने कायम करत आला. असहिष्णूतेचा आरोप भाजपा सरकारवर करणारी मंडळी वर्षानुवर्षे ठासून असहिष्णूता असलेली काँग्रेस त्यांना अडचणीचे असेल ते वगळत आली दडपत आली याबद्दल गप्प असतात. असहिष्णूता आणि दडपशाहीची असंख्य उदाहरणे काँग्रेस कारकीर्दीच्या पानापानावर सापडतील. काँग्रेसचा इतिहासात समतेचा विचार मांडणारे घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर निवडणूकीला काँग्रेसविरोधात उभे आहेत तर करा त्यांचा पराभव, त्यासाठी पंतप्रधान नेहरू त्यांच्या विरोधात सभा घेतात, देशात अंसतोष आहे, न्यायालयाचा निकाल वेगळा आहे लावा आणिबाणी, सोनिया गांधीच्या आगमनानंतर, राजीनामा देतो पण काँग्रेसची घटना पाळा अस सांगणाऱ्या दलित समाजातील सीताराम केसरींना द्या अपमानास्पद वागणूक, दिल्लीत फक्त नेहरू घराण्याच्या पंतप्रधानाच्या समाधी राहिल्या पाहिजेत मग नरसिंहरावांचे पार्थिव हैद्रबादेत नेण्यासाठी आणा दबाव. अशी अनेक उदाहरणे देता येतील. हिंदुत्व आणि सावरकरांच्या बाबतीतही तेच करण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला. पण त्यांच्या विरोधानंतरही हा विचार अजून उजळून निघाला.. म्हणूनच राहूल गांधीना सावरकर आपके है या प्रश्नावर समर्थ रामदासाच्या ओळीत उत्तर द्यावे वाटते

    "केला जरी पोत बळेची खाली
     ज्वाला तरी ते वरती उफाळी"


    केशव उपाध्ये, मुख्य प्रवक्ता.
  • You might also like

    No comments:

    Post a Comment