• शिवसेनेचं ‘गाढवही गेलं आणि ब्रम्हचर्यही गेलं’

        बाळासाहेब ठाकरे यांनी कम्युनिस्ट मंडळींना नेहमीच राष्ट्रविरोधी ठरविले. डाव्या मंडळींचा उल्लेख ते, ‘लाल माकडे’ अशा शब्दात करत असत. प्रकाश रेड्डी आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीचे छायाचित्र पाहिल्यावर हा सारा इतिहास आठवणे क्रमप्राप्त होते.

        अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत भारतीय कम्युनिस्ट पक्षाने उद्धव ठाकरे यांच्या सेनेला पाठींबा दिल्याचे वृत्त झळकले. कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉ. प्रकाश रेड्डी हे उद्धव ठाकरे यांना मातोश्रीवर भेटावयास गेल्याची छायाचित्रेही प्रसिद्ध झाली. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा पाठिंबाही उद्धवरावांनी तत्परतेने घेतला. कम्युनिस्टांनी उद्धवरावांच्या सेनेला दिलेला पाठींबा पाहून बरोबर ५२ वर्षापूर्वीच्या घटनेचे स्मरण झाले.

        ६ जून १९७० रोजी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे परळ मतदारसंघातील आमदार कॉ. कृष्णा देसाई यांच्या हत्येचे वृत्त परळ, लालबाग या गिरणगाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भागात वाऱ्यासारखे पसरले गिरणगावात कामगारांनी उस्फुर्त बंद पुकारला होता. मराठा दैनिकाने आठ कॉलमी मथळा दिला होता. ‘कॉ. कृष्णाचे खरे खुनी बाळ ठाकरे आणि वसंतराव नाईक.’ स्मशानभूमीत झालेल्या सभेत लाल निशाण गटाचे नेते कॉ. यशवंत चव्हाण यांनी कृष्णा देसाई यांच्या हत्येला तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हेच जबाबदार असल्याचा आरोप जाहीरपणे केला होता.

        बाळासाहेबांनी या आरोपांचा इन्कार केला होता. या हत्येप्रकरणी दिलीप हाटे, अशोक कुलकर्णी आणि विश्वनाथ खटाटे या तिघांना १४ वर्षाची शिक्षा सुनावली गेली. या हत्येनंतर झालेल्या पोट निवडणुकीत कृष्णा देसाई यांची पत्नी सरोजिनी आणि शिवसेनेचे वामनराव महाडिक यांच्यात लढत झाली. डाव्या चळवळीने ही निवडणूक प्रतिष्ठेची बनवली होती. कॉ. श्रीपाद अमृत डांगे संयुक्त समाजवादी पक्षाचे बाबुराव सामंत, प्रजा समाजवादी पक्षाचे सदानंद वरदे, शेकापचे टी. एस. कारखानीस, लाल निशाण गटाचे दत्ता देशमुख यासारख्यांनी सभा घेत शिवसेनेवर जोरदार टीकास्त्र सोडले होते. शिवसेनेनीही आपली सारी ताकद पणाला लावली होती. परळ येथे घेतलेल्या सभेत बाळासाहेब ठाकरेंनी डावे पक्ष हे राष्ट्रवादाचे विरोधक आहेत अशी जहाल टीका केली होती. त्या निवडणुकीत वामनराव महाडिक विजयी झाले.

        बाळासाहेब ठाकरे यांनी कम्युनिस्ट मंडळींना नेहमीच राष्ट्रविरोधी ठरविले. डाव्या मंडळींचा उल्लेख ते, ‘लाल माकडे’ अशा शब्दात करत असत. प्रकाश रेड्डी आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीचे छायाचित्र पाहिल्यावर हा सारा इतिहास आठवणे क्रमप्राप्त होते. केवळ भारतीय जनता पार्टीला विरोध करण्यासाठी उद्धवरावांनी कम्युनिस्ट मंडळींचा पाठींबा बिनदिक्कत स्वीकारला. आपल्या पिताश्रींनी हयातभर ज्या मंडळींना कडाडून विरोध केला त्यांचा पाठींबा स्वीकारताना उद्धवरावांच्या चेहऱ्यावर अपराधीपणाचा लवलेशही नव्हता. अर्थात एकदा कमरेचे सोडून डोक्याला गुंडाळायचे ठरवल्यावर अपराधीपणा वगैरे जाणवतच नाही. असो.

        आपली मूळ ओळख सत्ता लोभापोटी विसरून उद्धवरावांनी ‘‘एक ब्रह्मचारी गाढव झोंबता, म्हणोनिया लाता पळालें तें गाढवही गेले ब्रम्हचर्य गेले, तोंड काळे झाले जगामाजी हे ना तैसे झाले हे ना तैसे झाले, तुका म्हणे गेले वायाचि ते...’’ या तुकोबांच्या ओवीप्रमाणे स्वतः ची अवस्था करून घेतली आहे.

        शिवसेनेची महाराष्ट्रातील घोडदौड १९८७च्या विलेपार्ले विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत मिळालेल्या विजयानंतरच सुरु झाली, हे उद्धवरावांना आणि बाळासाहेब ठाकरेंवर निस्सीम श्रद्धा असणाऱ्या हजारो शिवसैनिकांना ठाऊक आहे. गर्व से कहो हम हिंदू हैही घोषणा देत बाळासाहेबांनी ही पोटनिवडणूक लढवली होती. या पोट निवडणुकीत शिवसेनेचे डॉ. रमेश प्रभू विजयी झाले. पुढे हिंदुत्वाचा प्रचारात वापर केल्याबद्दल न्यायालयाने डॉ. प्रभू यांची निवड रद्द ठरवली. हिंदुत्व आणि शिवसेना हे समीकरण या निवडणुकीपासूनच तयार झाले. काही वर्षांनी हिंदुत्वाचा प्रचारात उल्लेख केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने बाळासाहेब ठाकरे यांचा मतदानाचा हक्कही काढून घेतला होता. हिंदुत्व हा बाळासाहेब ठाकरे यांचा आणि त्यांच्यावर श्रद्धा असणाऱ्या शिवसैनिकांचा श्वास होता. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीशी युती करून उद्धवरावांनी हा श्वास कोंडला, तो केवळ सत्तेसाठी आणि भाजपा विरोधासाठी.

        शर्जील उस्मानी सारख्या हिंदुंविरोधात गरळ ओकणाऱ्याला उद्धवरावांनी मुख्यमंत्री असताना पाठीशी घातले. मशिदींवरील बेकायदा भोंग्यांबाबतही उद्धवरावांनी बोटचेपी भूमिका घेतली होती. बाळासाहेब ठाकरे यांचे श्रद्धास्थान असणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीका करणाऱ्या राहुल गांधींना जाब विचारण्याची हिम्मतही उद्धवरावांनी दाखवली नाही. मुख्यमंत्रीपद टिकवण्यासाठी उद्धवरावांनी, ‘घालीन लोटांगण, वंदिन चरण’चा एकपात्री प्रयोग अडीच वर्षे चालवला. कॉंग्रेस राष्ट्रवादीबरोबरच्या अडीच वर्षाच्या संसारामुळे शिवसेनेचा कडवा हिंदुत्ववादी चेहरा केव्हा हरवला हे कळलेच नाही.

        उद्धवरावांनी आता हिंदुत्वाबरोबरच राष्ट्रवादही सोडून दिला असे कम्युनिष्टांबरोबरच्या त्यांच्या चुंबा-चुंबीमुळे स्पष्ट झाले आहे. ज्या बाळासाहेब ठाकरे यांचा वारस म्हणून ते शिवसेनेवर हक्क सांगत होते. त्या बाळासाहेब ठाकरे यांनी हयातभर कम्युनिष्टांना कडवा विरोध केला त्याच कम्युनिष्टांचा ‘लाल सलाम’ उद्धवरावांनी स्वीकारला. कम्युनिष्ट आणि समाजवादी विचारधारेतील कार्यकर्ते, विचारवंत आणि पत्रकारांनी ८० आणि ९० च्या दशकात बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेला कसा विरोध केला होता, याचे अनेक दाखले इतिहासात सापडतात. त्याच शिवसेनेला भाजपा विरोधी म्हणून कवटाळताना डाव्या आणि समाजवादी विचारवंतांना, कार्यकर्त्यांना, पत्रकारांना हर्षोल्हास होतो आहे, हा नियतीने त्यांच्यावर उगवलेला सूडच.

        कम्युनिस्टांचा राष्ट्रवाद आणि हिंदुत्ववादाला असलेला विरोध जगजाहीर आहे. हा विरोध त्यांनी कधीच दडवून ठेवला नाही. उद्धवरावांनी हिंदुत्वातला "हि" उच्चारायचा नाही , याच अटीवर लालभाई उद्धवरावांच्या पाठीशी उभे राहिले आहेत. लालभाई आणि उद्धवरावांचा हा "तुझ्या गळा - माझ्या गळा"चा प्रयोग दोघांचेही वस्त्रहरण करणारा ठरला आहे. लालभाई, समाजवादी आणि उद्धवरावांच्या वैचारिक कोलांटउड्यांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीचा विचारधारेशी अखंड प्रामाणिक राहण्याचा ध्यास लखलखीतपणे उठून दिसतो. १९५१ मध्ये जनसंघाची स्थापना झाल्यापासून समान नागरी कायदा ,३७० व्या कलमाला विरोध या भूमिकेपासून तसूभरही न ढळता भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय राजकारणात आपला पाया विस्तारते आहे. बिगर काँग्रेसवादाचा विचार मांडून तो प्रत्यक्षात आणणाऱ्या डॉ. राम मनोहर लोहिया यांच्या शिष्यांनी १९९० च्या दशकांत काँग्रेसच्या पाठिंब्यावर केंद्रात आणि काही राज्यातही सत्ता मिळवली. केरळ मध्ये काँग्रेसला विरोध करणारे डावे पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसच्या पाठीशी उभे राहतात.

        विचारांचा असा सोयीस्कर बाजार भारतीय जनता पार्टीने कधीच मांडला नाही. स्वबळावर सत्तेत येताच कलम ३७० व कलम ३५ अ रद्द करून "एक देश में दो विधान, दो निशान , दो प्रधान नही चलेंगे" ही डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांची घोषणा प्रत्यक्षात आणली. "मंदिर वही बनायेंगे" ही घोषणाही प्रत्यक्षात आणली. दीनदयाल उपाध्याय यांनी मांडलेली अंत्योदयाची संकल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या ८ वर्षांत जनधन, उज्वला या सारख्या अनेक योजनांतून साकार केल्याचा अनुभव देशभरातील कोट्यवधी वंचित , गोरगरीब घेत आहेत. विचारधारेशी एकनिष्ठ राहूनच भारतीय जनता पार्टीने सामान्य माणसाचा विश्वास संपादन केला आहे.

     

    (लेखांची पूर्वप्रसिद्धी – महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन – १८ ऑक्टोबर २०२२)

    - केशव उपाध्ये, मुख्य प्रवक्ते

  • You might also like

    No comments:

    Post a Comment