• विश्‍वास गेला 'बारामती'त



    केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह हे मुख्यमंत्री शिंदे यांच्या गटाला देत तीच खरी शिवसेना असल्याचे शिक्कामोर्तब केले आहे. या मोठ्या निर्णयाने ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. यावर भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी लिहिलेला हा लेख...

    शरद पवार तथा साहेबांचे राजकारणातील वेगवेगळे रंग १९६७ पासून महाराष्ट्र पाहतोय. साहेब उर्फ बारामतीकर काका हे राजकारणातले थोर अष्टपैलू खेळाडू आहेत. फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण एवढेच नव्हे तर त्यांना यष्टीरक्षणही छान जमतं. आपल्याच संघातील धावबाद करणे या सारखे खेळ त्यांना उत्तम जमतात असे त्यांचे राजकारणातले सहकारी सांगतात. साहेब फलंदाजी करत असले आणि एखाद्या लांब मारलेल्या फटक्यावर त्यांना धाव घ्यायची असेल तर ते आपल्या नॉन स्ट्रायकर साथीदाराला धाव घेण्याची खूण करतील. मात्र त्याच्या नकळत प्रतिस्पर्ध्याच्या क्षेत्ररक्षकालाही खूण करतील. ही खूण कोणाच्याच लक्षात येत नाही. प्रतिस्पर्ध्याच्या क्षेत्ररक्षकाला केलेल्या खुणेमुळे साहेबांचा सहकारी फलंदाज धावबाद होत असे. या साथीदार फलंदाजाला काकानी क्षेत्ररक्षकालाही खूण केली होती हे फार उशीरा लक्षात येत असे, तो पर्यंत तो साथीदार तंबूत परतलेला असे. असो. साहेब गोलंदाजीला उतरतात तेंव्हा काही वेळा ते ४०-५० पावलांचा स्टार्ट घेतात. एवढा लांबलचक स्टार्ट पाहून प्रतिस्पर्धी फलंदाजाच्या छातीत धडकीच भरते. आपल्या दिशेने आता बाउन्सर येणार, अशा कल्पनेत फलंदाज रहात असे, पण साहेब एवढ्या लांबून पळत येऊन अंडर आर्म चेंडू टाकतात. असा चेंडू कसा खेळायचा हे फलंदाजाला ठाऊक नसल्याने तो हमखास बाद होतो. काही वेळा साहेब आपल्या मूळ गावी ’बारामती’ला जाण्यासाठी निघायचे, त्यांना सोडायला त्यांचे सहकारी, पाहुणे बस स्थानकावर जात असत. साहेब ’बारामती’ला जाणार्‍या विनावाहक विना थांबा बसमध्ये बसत असत. पण सोडायला आलेले सहकारी, पाहुणे गेल्यावर साहेब बारामतीची गाडी सोडून साबरमतीच्या गाडीत हळूच बसत असत.

    साहेबांच्या विश्‍वासार्हतेचे असे अनेक किस्से राजकीय वर्तुळात प्रसिद्ध आहेत. वसंतदादा पाटील यांच्यावर केलेल्या ‘खंजीर प्रयोगा’मुळे साहेबांचे राजकारणातल्या विश्‍वासार्हतेचे ब्रँड अँबेसेडर असे बारसे झाले. साहेब आपल्या सहकार्‍यांसह मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याच्या तयारीत असल्याची कुजबुज सुरु झाली त्यावेळी वसंतदादांनी साहेबांना, असं काही चालू आहे का अशी विचारणा केली होती. त्यावेळी साहेबांनी आपण मंत्रिमंडळातून बाहेर वगैरे पडणार नाही, असे दादांना सांगितले होते. खंजीर प्रयोगाबाबत त्यावेळचे साहेबांचे सहकारी प्रतापराव भोसले यांनी बरेच काही लिहीले आहे, सांगितले आहे. १९८० मध्ये इंदिरा गांधी पुन्हा पंतप्रधान झाल्यावर यशवंतराव चव्हाण यांनी स्वगृही परतण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी साहेबांनी आपल्या गुरुला म्हणजे यशवंतरावांना कसे तोंडघशी पाडले होते, याचेही किस्से पवारांचे त्यावेळचे काँग्रेसमधील सहकारी सांगत असतात.

    २०१९ मध्ये मावळ मतदारसंघातून अजित पवार यांच्या चिरंजीवाला म्हणजे पार्थ याला उमेदवारी देण्याचा विषय चर्चेत आला. त्यावेळी,”मी, अजित आणि सुप्रिया यांच्याशिवाय पवार घराण्यातील आणखी कोणी राजकारणात असणार नाही” असे साहेबांनी जाहीर केले होते. नंतर साहेबांनाच आपल्या नातवाची उमेदवारी जाहीर करावी लागली. साहेबांना आपले शब्द ’पुन्हा गिळावे’ लागले. साहेबांनी यापूर्वी आपले शब्द अनेकदा गिळले आहेत. समाजवादी काँग्रेसमध्ये असताना अंगाला राख फासून हिमालयात जाईन, पण इंदिरा काँग्रेसमध्ये जाणार नाही, अशी गर्जना करणार्‍या साहेबांनी राजीव गांधींच्या साक्षीने १९८६ मध्ये औरंगाबादेत आपला अख्खा पक्षच काँग्रेसमध्ये विलीन करून टाकला. सोनिया गांधी विदेशी आहेत म्हणून त्यांचे नेतृत्व मान्य नाही, असे म्हणत १९९९ मध्ये तारीक अन्वर आणि पी.ए.संगमा यांच्या सहकार्याने बंडाची तलवार उपसणार्‍या साहेबांनी अवघ्या सहा महिन्यात सोनियांचे इटालियन भाषेतील पोवाडे गायला सुरुवात केली होती.

    राजकीय सर्कशीमध्ये ट्रॅपीजचे प्रयोग करताना कोणाचा हात अचानक सोडायचा आणि कोणाला हात द्यायचा, याचे गुण दर्शनाचे अनेक प्रयोग साहेबांनी राज्यात केले आहेत. १९९८ मध्ये राज्यसभा निवडणुकीत सोनिया गांधी यांचे विश्‍वासू समजले जाणारे राम प्रधान हे काँग्रेसचे उमेदवार होते. साहेब त्यावेळी काँग्रेसमध्ये होते. त्या निवडणुकीत काँग्रेसची मते फुटल्यामुळे प्रधान यांचा धक्कादायक पराभव झाला. या पराभवाचे बिल साहेबांच्या नावावर फाटले गेले होते. मोठ्या कष्टाने कमावलेल्या या '' विश्वासार्हतेमुळेच '' साहेबांचा पक्ष महाराष्ट्रात एका मर्यादेपलीकडे वाढू शकला नाही. समाजवादी काँग्रेसची विधानसभा निवडणुकीतील दौड १९८० आणि १९८५ मध्ये ५५-५६ जागांपर्यंतच गेली . राष्ट्रवादी काँग्रेस ला २००४ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये मिळालेल्या ७४ जागांचा अपवाद वगळला तर ६० च्या वर मजल मारता आली नाही. १९९९ ते २०१९ या काळात झालेल्या ५ लोकसभा निवडणुकीत साहेबांना राज्यातून कधी दोन अंकी जागा मिळवता आल्या नाहीत. देवीलाल , एन. टी. रामाराव, चंद्राबाबू नायडू , ममता बॅनर्जी , चंद्रशेखर राव अशा अनेक प्रादेशिक नेत्यांनी आपापल्या राज्यांत स्वबळावर सत्ता मिळवली . मात्र साहेबांना सत्तेच्या जवळपासही जाता आले नाही.

    साहेबांचा राजकीय इतिहास विस्ताराने सांगण्याचे कारण म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्या साथीत घेतलेली शपथ हा सध्या चर्चेचा विषय बनला आहे. शरद पवार यांच्या संमतीनेच तो शपथविधी झाला होता, असे श्री. फडणवीस यांनी एका मुलाखतीत सांगितल्याने राजकीय आणि प्रसारमाध्यमांच्या वर्तुळात धमाका होणे साहजिकच होते. साहेबांनी याचा तातडीने इन्कार करत ‘तो मी नव्हेच’ असा विश्‍वामित्री पवित्रा घेतला आहे. देवेंद्र फडणवीस यांची आजवरची राजकीय कारकीर्द पाहता ते राजकीय फायद्या-तोट्यासाठी अशी सनसनाटी विधाने करणे शक्यच नाही. २०१४ मध्ये विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होत असताना साहेबांनी भारतीय जनता पार्टीला सरकार बनवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस तयार आहे, असे जाहीर करून टाकले होते. साहेबांचा पक्ष त्यावेळी काँग्रेसच्या साथीत होता. असे असतानाही साहेबांनी भाजपाला पाठिंबा देण्याची तयारी दर्शवून आपला विश्‍वासार्हतेचा ब्रँड किती मजबूत आहे, हेच दाखवून दिले होते. हा इतिहास पाहिल्यावर फडणवीस यांचा अजित पवारांबरोबरचा शपथविधी साहेबांच्या संमतीखेरिज झाला होता, असे म्हणण्याशिवाय पर्याय राहत नाही. साहेबांचा हा इतिहास पाहिल्यावर,“विश्‍वास गेला पानिपतात”, हा रूढ शब्दप्रयोग बदलून “विश्‍वास गेला बारामतीत”, असा शब्दप्रयोग प्रचलित होण्यास हरकत नसावी.

     

    (लेखाची पूर्वप्रसिद्धी – महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन, १९ फेब्रुवारी. २०२३)

     

    केशव उपाध्ये, मुख्य प्रवक्ता

  • You might also like

    No comments:

    Post a Comment