• ठाकरेंचे वक्तव्य नैराश्याचे द्याोतक


    एक तर तू राहशील नाही तर मी राहीन,’ अशी भाषा उद्धव ठाकरे करू लागले आहेत. विश्वासघात करून आणि महत्प्रयासाने मिळवलेले मुख्यमंत्रीपद अडीच वर्षांत गमवावे लागल्याने आलेले वैफल्यच त्यांच्या भाषेतून प्रकट होते. भाजपच्या नेतृत्वाने अपयशाचे असे कडू घोट अनेक वर्षे पचवले आहेत. त्यातून धडे घेत पक्षाची वाटचाल अखंडपणे सुरू आहे. उद्धव ठाकरे अशी विखारी टीका करण्यापेक्षा आपल्याच पक्षातील ४०५० आमदार का बाहेर पडले, याचा विचार का करत नाहीत?


    उद्धव ठाकरे यांची टोमणे मारण्याची सवय महाराष्ट्राला ठाऊक आहे. पण अलीकडे त्यांनी,‘एक तर तू राहशील नाही तर मी’, अशी आरोळी ठोकली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून उद्धव ठाकरे यांनी ही आरोळी ठोकली आहे. रुग्णशय्येवर पडलेल्या एखाद्या रुग्णाला अपघाताने एखादी संजीवनी मिळावी आणि त्याला नवजीवन प्राप्त व्हावे, तसाच असा प्रकार उद्धव ठाकरे यांच्याबाबतीत नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत घडला. लोकसभा निवडणुकीत मुस्लीम समाजाने केलेल्या एकतर्फी मतदानामुळे उद्धव ठाकरे, काँग्रेस आणि शरद पवारांच्या महाविकास आघाडीला नवसंजीवनी प्राप्त झाली. २०२४ पर्यंतच्या लोकसभा निवडणुकीत मुस्लीम समाजाने कधीही एवढे एकतर्फी, एकजुटीने आणि एवढ्या मोठ्या संख्येने मतदान केले नव्हते. पूर्वीच्या निवडणुकांपेक्षा मुस्लीम मतदानात सरसकट वाढ दिसत असल्याचा, ढोबळ अंदाज आहे. याचा अर्थ प्रत्येक मतदारसंघात, एकूण मतदार संख्येपैकी मुस्लीम मतदारांचे मतदान ७० ते ८० टक्के झाले असावे. हे वाढलेले मतदान महाविकास आघाडीच्या पारड्यात पडल्याने आघाडीला ३१ जागा मिळाल्या.

    व्होट जिहाद’ची मात्रा आणि संविधान बदलाच्या अफवेचा परिणाम महाविकास आघाडीच्या कामगिरीवर झाला. त्यामुळेच तोळामासा तब्येत असलेला सिक्स पॅक अॅब्स कमावलेल्या व्यक्तीला आव्हान देऊ लागतो तसे काहीसे उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस यांना आव्हान देऊ लागले आहेत. नागरिकत्व सुधारणा कायदा अर्थात सीएए कायद्याचा वापर करून तुम्हाला देशाबाहेर काढले जाईल, अशी भीती दाखवून मुस्लीम समाजाला भारतीय जनता पक्षाच्या विरोधात उतरवण्याचे कारस्थान काही मंडळींनी देशभर केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत आगामी काही वर्षात जागतिक पटलावर वेगाने स्वतंत्र स्थान निर्माण करण्याची शक्यता दिसू लागल्याने काही परकीय शक्तींनी देशातील भाजप विरोधकांना हाताशी धरत मुस्लिमांना देशाबाहेर काढणार, अनुसूचित जाती-जमातींचे आरक्षण रद्द करणार, संविधान बदलणार यासारख्या अनेक अफवा पसरवल्या. परिणामी मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला. त्याचा फायदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला आणि महाविकास आघाडीला झाला. या यशामुळेच उद्धव ठाकरेंना चेव चढला आहे.

    देवेंद्र फडणवीस यांना आव्हान देताना आपण मोठे शूरवीर, निधड्या छातीचे आहोत, असा आव त्यांनी आणला आहे. राजकारणात स्पर्धा, ईर्षा अभिप्रेतच आहे. मात्र या स्पर्धेची, ईर्षेची सीमारेषा असते. महाराष्ट्रात आजवर ही सीमारेषा ओलांडण्याचे पातक कोणीही केले नव्हते. उद्धव ठाकरेंनी राजकारणाच्या खेळातील सभ्यतेच्या सर्व सीमा पार केल्या आहेत.

    राजकारणात लढताना नैतिक पातळीवर किती घसरायचे याचे भान उद्धव ठाकरेंनी केव्हाच गमावले होते. २०१४च्या विधानसभा निवडणुकीतच त्याचे दाखले मिळाले होते. त्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील महायुतीला ४८ पैकी ४२ जागा मिळाल्या होत्या. या यशामुळे उद्धव ठाकरेंची अनेक वर्षांची मुख्यमंत्रीपदाची लालसा उफाळून वर आली. त्यामुळे २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत जागा वाटपावरून आडमुठी भूमिका घेत २५ वर्षांची भाजपबरोबरची युती तोडण्यापर्यंत त्यांची मजल गेली. स्वबळावर बहुमत न मिळाल्याने त्यांना नाइलाजाने भाजपबरोबर राज्य सरकारमधील सत्तेत सहभागी व्हावे लागले.

    २०१४ ते २०१९ या काळात केंद्रात आणि राज्यात भारतीय जनता पक्षाबरोबर सत्ता उपभोगणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मागे टाकत विरोधकाची भूमिकाही बजावली. मोदी सरकार आणि भाजपला अखंड शिव्याशाप देणाऱ्या उद्धव ठाकरे यांना भाजप नेतृत्वाने केवळ वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना स्मरत सहन केले. अनेक वर्षांचा हिंदुत्वाचा साथीदार याच भूमिकेतून भाजप नेतृत्वाने सामोपचाराची भूमिका घेतली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मतदारांनी भाजप आणि शिवसेना युतीला स्पष्ट बहुमताचा कौल दिला होता. मात्र २०१४ पेक्षा भाजपच्या जागा १९ ने कमी झाल्या होत्या. बहुमताच्या गणितातील ही छोटी फट लक्षात घेत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाची आपली महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी भाजपची साथ सोडत काँग्रेस-राष्ट्रवादीशी घरोबा केला. युद्धात आणि राजकारणात नीती- अनीतीचे संकेत असतात. युद्धात आणि राजकारणातही अनीतीने काही काळ निश्चितच फायदा होऊ शकतो. मात्र अनीतीच्या मार्गाने जाण्याचे दीर्घकालीन तोटेही असतात. या मार्गाने गेल्यामुळे होणारे नुकसान कधीच भरून निघत नाही. रामायण आणि महाभारतात अनीतीने वागणाऱ्या रावण आणि कौरव सेनेला अंतिमत: संपूर्ण पराजयच पत्करावा लागला होता.

    विश्वासघात करून आणि महत्प्रयासाने मिळवलेले मुख्यमंत्रीपद अडीच वर्षांत गमवावे लागल्याने उद्धव ठाकरे यांना आलेले वैफल्य त्यांच्या अभद्र भाषेतून प्रकट होते. लोकसभा निवडणुकीत पसरवलेल्या खोट्यानाट्या गोष्टींचे नाणे विधानसभा निवडणुकीत चालणार नाही. विधानसभा निवडणुकीतील यश- अपयशाची समीकरणे अत्यंत वेगळी असतात. लोकसभा निवडणुकीत वापरलेली खोट्या प्रचाराची अनीती विधानसभा निवडणुकीवेळी उपयुक्त ठरणार नाही, हे हळूहळू लक्षात येऊ लागल्याने उद्धव ठाकरेंचे वैफल्य दिवसागणिक वाढू लागले आहे. त्यातूनच ‘एक तर तू राहशील नाही तर मी राहीन,’ यासारखी भाषा त्यांच्या तोंडून ऐकू येते. भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने राजकारणातील पीछेहाट, अपयश याचे अनेक कडू घोट अनेक वर्षे पचवले आहेत. प्रत्येक पीछेहाटीतून धडे घेत या पक्षाची वाटचाल अखंडपणे सुरू आहे. आपल्याच पक्षातील ४०-५० आमदार का बाहेर पडतात, याचा विचार करण्याची गरज न भासलेले उद्धव ठाकरे राजकारणातले प्राथमिक धडेही विसरून गेले असल्याचे दिसते. त्यांनी कितीही डरकाळ्या फोडल्या तरी त्यांना आणि महाविकास आघाडीला महायुतीचा विजयरथ थांबविता येणार नाही.


    (लेखाची पूर्वप्रसिद्धी –लोकसत्ता,०६ ऑगस्ट २०२४)

    केशव उपाध्येमुख्य प्रवक्ता

  • You might also like

    No comments:

    Post a Comment