• पहिली बाजू : घरगुती मुलाखतीतील रडगाणे

     



    माजी मुख्यमंत्री उद्धवराव ठाकरे यांची त्यांच्याच पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी घेतलेली ‘घरगुती आणि दीर्घ मुलाखत’ नेहमीप्रमाणे रडगाणे स्वरूपाचीच होती. वर्षांनुवर्षे त्याच त्या भाषेचे दळण दळणाऱ्या उद्धवरावांची ही मुलाखत त्यांच्या हताश आणि वैफल्यग्रस्त मनोवृत्तीची साक्ष देणारी होती. २०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भारतीय जनता पार्टीशी केलेल्या दगाबाजीचे समर्थन करता येत नसल्याने आणि काँग्रेस- शरद पवारांच्या संगतीला जाऊन बसावे लागल्याने आपले डावपेच चुकल्याची अप्रत्यक्ष कबुलीच त्यांना अशा मुलाखतीद्वारे द्यावी लागत आहे.

    राजकारणाच्या पटावरच्या सोंगटय़ा मनाविरुद्ध पडल्यानंतर त्याही परिस्थितीत लढण्याचे धैर्य आणि चातुर्य दाखवणारा राजकारणीच या खेळात पाय रोवून उभा राहतो, याचे आकलन करण्याची क्षमता नसल्याने आपला  असहायपणा शब्दांचे बुडबुडे उडवून झाकणाऱ्या उद्धवरावांकडे पाहून महाभारतातली दुर्योधन, दु:शासन, ध्रृतराष्ट्र, शकुनीमामा अशी अनेक पात्रे डोळय़ापुढे उभी राहतात. या समस्त पात्रांच्या गुणवैशिष्टय़ांचा समुच्चय असलेल्या उद्धवरावांना नियतीने केलेल्या परतफेडीचा घाव सहन करता आलेला नाही, हे मुलाखत पाहताना वारंवार जाणवत होते.

    पांडवांना हक्काने मिळणारे राज्य कपटाने हिसकावून घेणारे कौरव आपल्या सत्तेच्या हव्यासाचे जाहीरपणे निर्लज्ज समर्थन करत होते. सुईच्या टोकावर मावेल एवढी जमीनही पांडवांना देणार नाही, असे सांगण्याचा उद्दामपणा दुर्योधनाने राजसभेत दाखवला होता. भारतीय जनता पार्टीशी मुख्यमंत्रीपदाच्या लालसेने आपण दगाबाजी केली. हे कबूल करण्याएवढे धैर्य उद्धवरावांकडे नसल्याने भाजप श्रेष्ठींनी न दिलेल्या शब्दाचे असत्य कथन करत आपल्या दगाबाजीच्या मुखवटय़ाला नैतिकतेचा लेप चढवण्याचा प्रयत्न उद्धवरावांकडून गेल्या साडेतीन वर्षांत वारंवार होतो आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनाप्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रखर राष्ट्रवादाचे वारंवार स्मरण होणे साहजिकच आहे. श्रीमती सोनिया गांधी यांच्या राजकारण प्रवेशावेळी बाळासाहेब यांनी, ‘तुम्हाला रामराज्य हवे की रोमराज्य’ असा परखड सवाल केला होता.

    श्रीमती सोनिया गांधी यांच्या विदेशी नागरिकत्वाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या राजकारण प्रवेशाला विरोध झाला होता. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी याच मुद्दय़ावर सोनियाजींना विरोध केला होता. हयात असेपर्यंत आदरणीय बाळासाहेबांनी आपली सोनियाजींबद्दलची भूमिका तसूभरही बदलली नाही. शरद पवार यांनी त्यांच्या परंपरागत शैलीनुसार सोनियाजींबद्दलची आपली भूमिका बदलली. बाळासाहेबांचे सुपुत्र असलेल्या उद्धवरावांनी मुख्यमंत्रीपदासाठी सोनिया गांधी यांच्यापुढे आपली स्वाभिमानाची, राष्ट्रवादाची अस्त्रे समर्पित केली. १९८८ मध्ये ठाणे महापौरपदाच्या निवडणुकीत एका मताने दगाबाजी झाल्यामुळे शिवसेनेचा उमेदवार पराभूत झाला होता. ही दगाबाजी जिव्हारी लागल्यामुळे सर्व नगरसेवकांना राजीनामे द्यावयास लावून चार वर्षांनी पुन्हा दणक्यात बहुमत मिळवण्याची धमक दाखवलेले आदरणीय बाळासाहेब ठाकरे आणि मुख्यमंत्रीपदासाठी दगलबाजी करणारे उद्धवराव हा दोन प्रवृत्तींतील फरक सामान्य माणसाच्या आकलनात येत नसेल असे म्हणण्याचे धाडस कोणी करणार नाही.

    स्वामी स्वरूपानंदांनी म्हटल्याप्रमाणे ‘कर्म तैसे फळ लाभते केवळ’ आणि ‘कांते बोल लावू नये पेरोनिया साळी गव्हाचे ते पीक घ्यावया नि:शंक धावू नये उत्तरासारखे येते प्रत्युत्तर। करावा विचार आपणाशी’. भारतीय जनता पार्टीशी विश्वासघात केलेल्या उद्धवरावांना आणि वर्षभरापूर्वी झालेल्या सत्तांतराबद्दल गळे काढणाऱ्या उद्धवरावांकडे पाहताना स्वामी स्वरूपानंदांच्या या वचनाचा दाखला अपरिहार्यपणे पुढे येतो. आदरणीय बाळासाहेबांनी कायमच निधडय़ा छातीने राजकारण केले. आदरणीय बाळासाहेबांच्या प्रखर विचारधारेचं सतीचं वाण पेलण्याची आपली कुवत नाही याचे प्रत्यंतर घरगुती मुलाखतीत वारंवार येत होते. १९८९ ते २०१३ या काळात भारतीय जनता पार्टीबरोबर आदरणीय बाळासाहेबांचे जागावाटप, अन्य मुद्दय़ांवर अनेकदा मतभेद झाले होते. या मतभेदांबद्दल आदरणीय बाळासाहेबांनी वेळप्रसंगी कडवट भाषाही वापरली होती. मात्र भाजप-शिवसेना युती तुटू नये याची खबरदारीही आदरणीय बाळासाहेबांनी नेहमीच घेतली. यामागचे राजकारणाचे पाठ गिरवण्याची तसदी उद्धवरावांनी कधीही घेतली नाही. यामुळेच राजकारणाच्या गणितातील प्रमेय त्यांच्या बौद्धिक विश्वापलीकडेच राहिले. आजूबाजूच्या झिलकऱ्यांनी त्यांना राजकारणाचे कडू घोट कधी रिचवू दिले नाहीत. त्याचा परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणात शेखचिल्ली निर्माण होण्यात झाला.

    ब्रायन ट्रेसी या कॅनेडियन लेखकाने आदर्श नेत्याचे पुढील भाषेत वर्णन केले आहे.  Become the kind of leader that people would follow voluntarily, even if you had no title or position. आदरणीय बाळासाहेब ब्रायन ट्रेसीच्या आदर्श नेत्याच्या व्याख्येत बसणारे होते. सुधीर जोशी, प्रमोद नवलकर, दत्ताजी नलावडे, वामनराव महाडिक अशी लढवय्या आणि संघटनाकुशल नेत्यांची फळी बरोबर घेऊन बाळासाहेबांनी ‘शाखा’ पातळीवरून संघटनेची बांधणी केली. स्थानीय लोकाधिकार समितीसारख्या संघटना बांधत शिवसेनेला सामान्य मराठी माणसाशी कायमस्वरूपी धाग्याने बांधणाऱ्या बाळासाहेबांना राजकारणाची अंकलिपी अवगत होती. राजकारणात दोन अधिक दोन या बेरजेचे उत्तर कधीच चार नसते, हे सामान्यज्ञान कोळून प्यायलेल्या बाळासाहेबांनी संघटनेच्या विचारसरणीचा कधी बाजार मांडला नाही. याउलट उद्धवरावांच्या काळात संघटना बांधणीसाठी लागणारी उपक्रमशीलता, धडाडी, परिश्रमाची तयारी अभावानेच दिसली. याचा परिणाम १९९९ नंतर शिवसेनेच्या संघटनेला उतरती कळा लागण्यात झाला. बाळासाहेबांनी संघटनेच्या सामर्थ्यांचा अभिमान बाळगताना संघटनेच्या बळाला असलेल्या मर्यादांचे नेहमीच भान ठेवले. उद्धवरावांना यापैकी कशाचीच जाण नसल्याने त्यांची गाडी घरगुती मुलाखतीवर येऊन थांबली आहे. ही गाडी नजीकच्या काळात तरी रुळावर येईल अशी चिन्हे नाहीत.

     

    (लेखाची पूर्वप्रसिद्धी लोकसत्ता, ०१ ऑगस्ट २०२३)

    केशव उपाध्ये, मुख्य प्रवक्ता

  • You might also like

    No comments:

    Post a Comment