• ऐक्याची जुनीच सर्कस, नव्या नावाने



    विरोधकांची सत्तेची आशा सुटत नसल्यामुळे आजवर एकमेकांचे तोंडही पाहण्यास तयार नसलेली ही मंडळी आज एकमेकांच्या गळ्यात गळे घालून ऐक्याची ललकारी देत आहेत. विरोधकांच्या या दुर्दम्य आशावादामागे कोणताही विधायक कार्यक्रम नाही. केवळ आणि केवळ मोदी विरोध या एकाच कार्यक्रमाभोवती या सर्कशीचा तंबू उभा करण्याची धडपड सुरु आहे.

    अलीकडेच देशभरातील विरोधी पक्षांनी भारतीय जनता पार्टीला विरोध करण्यासाठी आघाडीचा खेळ पुन्हा मांडण्याची तयारी सुरू केली आहे. बंगळुरू मुक्कामी या खेळाच्या संहितेसाठी बैठक झाली. संहितेच्या निर्मितीत भाग घेतलेल्या अनेक कलाकारांना त्यांचा प्रयोग पूर्णपणे यशस्वी होणार अशी खात्री वाटते आहे. २०१४ पासून भारतीय जनता पार्टीच्या विरोधात पर्यायी आघाडी तयार करण्याचे खेळ कितीदा झाले याची गणतीही करता येत नाही .परस्पर विरोधी विचारसरणी असलेल्या, यापूर्वी एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या या कलाकारांना एकत्र येण्याचा अजूनही सोस आहे याचे आश्चर्य वाटल्याखेरीज राहत नाही.

    “आशा नाम मनुष्याणां काचिदाश्चर्यशृङ्खला । यया बद्धा: प्रधावन्ति मुक्तास्तिष्ठन्ति पङ्गुवत् ।।” असे एक सुभाषित आहे. या सुभाषिताच्या अर्थाप्रमाणे विरोधी मंडळींना सत्तेच्या अतीव आशेमुळे एकमेकांसोबत येणे भाग पडले आहे. विरोधकांची सत्तेची आशा सुटत नसल्यामुळे आजवर एकमेकांचे तोंडही पाहण्यास तयार नसलेली ही मंडळी आज एकमेकांच्या गळ्यात गळे घालून ऐक्याची ललकारी देत आहेत. विरोधकांच्या या दुर्दम्य आशावादामागे कोणताही विधायक कार्यक्रम नाही. केवळ आणि केवळ मोदी विरोध या एकाच कार्यक्रमाभोवती या सर्कशीचा तंबू उभा करण्याची धडपड सुरु आहे.

    भारतीय राजकारणाच्या प्रवाहात १९५२ मध्ये झालेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीपासून काँग्रेस, समाजवादी, साम्यवादी आणि जनसंघाच्या रूपाने हिंदुत्ववादी अशा विचारधारा सक्रीय होत्या. काँग्रेसमध्ये समाजवादी, साम्यवादी या प्रवाहातील अनेक बुजूर्ग सहभागी झाले होते त्यामुळे काँग्रेसचा विचार मध्यम मार्गी म्हणून ओळखला होता. त्याकाळी काँग्रेसला देशव्यापी पातळीवर पर्याय नव्हता. समाजवादी प्रवाहातील पक्ष त्यांच्या वैचारिक पिंडाप्रमाणे संघटित राहू न शकल्याने या प्रवाहातून तयार झालेल्या पक्षांची अनेक शकले झाली आणि राष्ट्रीय राजकारणात इतस्तत: विखुरली गेली. साम्यवादी प्रवाहाने केरळ, प.बंगाल या राज्यातील आपली पाळेमुळे हळूहळू मजबूत करत नेली होती. या राज्यामध्ये डाव्या आघाडीने अनेक वर्षे राज्यही केले. मात्र डाव्या आघाडीलाही आपला विचार देशव्यापी न बनवता आल्याने ही आघाडी बोन्साय रूपाने राष्ट्रीय राजकारणाच्या रंगमंचावर आपले अस्तित्व दाखवत राहिली. या तीन प्रवाहांच्या तुलनेत जनसंघाचा प्रभाव राष्ट्रीय राजकारणात तुलनेने उशिरा जाणवू लागला. जनसंघ आणि भारतीय जनता पार्टीला अनेक वर्षे राजकीय अस्पृश्यता सहन करावी लागली. ३७० वे कलम रद्द करणे, समान नागरी कायद्याची निर्मिती करणे या दोन मागण्या जनसंघाने आपल्या स्थापनेपासून सातत्याने मांडल्या. १९८५ नंतर या दोन मागण्यांच्या जोडीला अयोध्या येथील श्री राम मंदिर निर्मितीच्या मागणीचा समावेश झाला. काँग्रेस, समाजवादी आणि साम्यवादी या तिन्ही प्रवाहांनी जनसंघ आणि भारतीय जनता पार्टीच्या विचारसरणीला कडाडून विरोध केला. १९६० आणि ७० च्या दशकात प्रभावी असलेल्या समाजवादी आणि साम्यवादी विचारसरणीतील पक्षांचे अस्तित्व संकुचित होत गेल्याने हळूहळू भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय राजकारणाच्या केंद्र स्थानाकडे वाटचाल करू लागल्याचे चित्र १९९० च्या दशकात दिसले.

    २०१४ नंतर राष्ट्रीय राजकारणाचा सारीपाट कमालीच्या वेगाने अकल्पित रितीने बदलला. मोदी सरकारच्या कामगीरीमुळे ,लोककल्याकारी योजनांमुळे विरोधी पक्षांचा मतदार हा भाजपाकडे वळला. मोदीजींना कोणत्या तोंडाने विरोध करावा हे विरोधकांना कळेनासे झाले आहे. जनसंघ आणि त्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या विरोधात अनेक वर्षे चालू असलेल्या अपप्रचारामुळे भाजपाला आपला विस्तार करताना मोठे परिश्रम करावे लागले. भाजपा विरोधात अपप्रचार करताना वापरली गेलेली कुटनिती गेल्या ९ वर्षात पूर्णपणे निष्प्रभ झाल्याने विरोधी मंडळींना आपले अस्तित्व टिकवण्यासाठी ऐक्याच्या सर्कशीचा नव्याने खेळ लावण्याची गरज निर्माण झाली. २०१९ च्या निवडणुकीपूर्वी वेगवेगळ्या कलाकारांनी ही सर्कस लावली होती. त्याची फलनिष्पत्ती काय झाली हे २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालातून दिसले आहेच .

    विरोधकांच्या सर्कशीत दाखल झालेले चेहरे भारतीय मतदारांना अनेक वर्षांपासून परिचित आहेत. उत्तर प्रदेशात लोकसभेच्या सर्वाधिक ८० जागा आहेत. या राज्यात समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष, राष्ट्रीय लोकदल या तीन पक्षांनी २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला एकत्रित येऊन आव्हान दिले होते. तीन प्रमुख पक्ष एकत्र आल्यामुळे उत्तर प्रदेशातील भारतीय जनता पार्टीचे संख्या बळ घटणार असे पतंग अनेक राजकीय निरीक्षकांनी उडवण्यास सुरूवात केली होती. भाजपा विरोधी मतांचे विभाजन टाळल्यामुळे उत्तर प्रदेशातील भाजपाच्या जागा २०-२५ पर्यंत खाली येतील आणि केंद्रात भाजपाला स्वबळावर सत्ता मिळवता येणार नाही , अशी स्वप्ने काहींना दिवसा ढवळ्या पडत होती. प्रत्यक्षात निकाल हाती आल्यावर भाजपाच्या उत्तर प्रदेशातील जागा फक्त ९ ने कमी होत त्या ७१ वरून ६२ झाल्या. त्याआधी २०१७ मध्ये उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीत त्यावेळच्या सत्ताधारी समाजवादी पक्षाने काँग्रेसशी आघाडी केली होती. त्या निवडणुकीतही या आघाडीचा मतदारांनी धुव्वा उडवला होता. प.बंगाल आणि केरळमध्ये वाढवलेल्या सामर्थ्याच्या जोरावर एकेकाळी काँग्रेस विरोधी राजकारणात महत्त्वाचे स्थान प्राप्त केलेल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला आणि डाव्या आघाडीला आता काँग्रेसच्या मागे फरपटत जावे लागत आहे. केरळमध्ये डाव्या आघाडीचे सरकार आहे. तर काँग्रेस प्रमुख विरोधी पक्षाच्या भूमिकेत आहे. राज्यात कम्युनिस्ट विरोध आणि राष्ट्रीय पातळीवर कम्युनिस्टांबरोबर आघाडी अशा विचित्र विसंगतीने ही सर्कस किती वेळ चालणार असा प्रश्न सर्कशीतल्या कलाकारांनाही पडला आहे. प.बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विरोधात काँग्रेस आणि डाव्या आघाडीची युती आहे. ममता बॅनर्जींची तृणमुल काँग्रेस, डावी आघाडी आणि काँग्रेस हे भाजपा विरोधात एकाच आघाडीत सहभागी होतात, यासारखा दुसरा मोठा राजकीय विनोद नसेल.

    विचारधारा, कार्यक्रम यापैकी कशातही एकमत नसताना परस्परविरोधी विचारांची ही मंडळी भारतीय जनता पार्टीला आव्हान देण्याची भाषा करत आहेत . भाजपाविरोधी मतांचे विभाजन टाळले तर भाजपाला पराभूत करणे सोपे आहे. असा युक्तिवाद करणाऱ्यांनी कर्नाटकमधील २०१९ च्या लोकसभा निवडणुकीचे निकाल तपासून पहाण्यास हरकत नाही. कर्नाटकात काँग्रेस आणि देवेगौडा यांचा जनता दल यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी आघाडी केली होती. त्यावेळी या दोन्ही पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी भाजपाला लोकसभेची एकही जागा जिंकता येणार नाही, अशा बढाया मारल्या होत्या. प्रत्यक्षात भारतीय जनता पार्टीच्या जागा आठने वाढल्या. २०१४ मध्ये भाजपाला १७, काँग्रेस ९ आणि जीडीएस २. जनता दल २ अशा जागा मिळाल्या होत्या. २०१९ मध्ये भाजपला २५, तर काँग्रेस आणि जनता दलाला प्रत्येकी एक जागा मिळाली होती. भाजपाविरोधी मतांचे विभाजन टाळणे या एकाच गृहितकावर विरोधकांचा ऐक्याचा तंबू उभा करण्याची धडपड चालू आहे. हे गृहितक किती तकलादू आहे, याचा प्रत्यय यापूर्वी येऊनही पुन्हा याच हेतूने एकत्र येऊ पाहणाऱ्या विरोधकांच्या पदरी अपयशाखेरीज काही पडणार नाही. मतदारांना निवडणुका होईपर्यंत ऐक्याच्या या दशावतारी खेळाची मजा अनुभवता येणार आहे.


    (लेखाची पूर्वप्रसिद्धी –लोकमत ऑनलाइन, जुलै २०२३)

    केशव उपाध्ये, मुख्य प्रवक्ता

  • You might also like

    No comments:

    Post a Comment